हिंदी चित्रपटांच्या दुनियेत संयत अभिनयासाठी मैलाचा दगड मानले जाणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक कुमार उर्फ दादामुनी यांचा आज (१० डिसेंबर २०२०) १९वा स्मृतिदिन. विविध पद्धतीच्या भूमिका सहजतेने पार पाडणाऱ्या दादामुनींच्या सदैव टवटवीत स्मृतींना आदरांजली.
चित्रपटसृष्टीत तंत्रज्ञ बनण्यासाठी मुंबईत येऊन बॉम्बे टॉकीजमध्ये काम करू लागलेले कुमुदलाल गांगुली कॅमेऱ्यासमोर अभिनेता म्हणून उभे राहिले व ‘अशोक कुमार’ बनले, हा केवळ योगायोग.
१९३६मध्ये बॉम्बे टॉकीजमध्ये ते लॅबोरेटरी असिस्टंट म्हणून काम करत असताना मालक हिमांशू रॉय यांनी ‘जीवन नैया’ या चित्रपटाच्या निर्मितीला सुरुवात केली होती. रॉय यांच्या पत्नी देविका राणी नायिका होत्या; पण ऐन वेळी चित्रपटाचा नायक देविका राणींना घेऊन पसार झाला. पुढे त्या परतल्या पण रॉय यांनी त्या अभिनेत्याला माफ केले नाही. त्याच्या ऐवजी तरुण नवख्या कुमुदलालच्या चेहऱ्यावर मेकअप करण्याचे फर्मान सुटले.
नाइलाज म्हणून व स्वत:च्या इच्छेविरुद्ध ते कॅमेऱ्यासमोर उभे राहिले व हिंदी चित्रपटसृष्टीला एक बहुआयामी ताकदीचा अभिनेता गवसला. १९३६पासून पुढील पाच दशके अशोक कुमार हिंदी चित्रपटात तळपत राहिले. प्रणयी नायकापासून चरित्र अभिनेत्यापर्यंत व विनोदी भूमिकांपासून खलनायकापर्यंत सर्व पद्धतीची कामे त्यांनी केली.
‘अछूत कन्या’, ‘किस्मत’, ‘भाई-भाई’, ‘महल’, ‘आशीर्वाद’ अशा अनेक यशस्वी चित्रपटांनंतर त्यांनी किशोर कुमार व अनुप कुमार हे आपले दोन भाऊ, तसेच मधुबाला यांच्या साथीने ‘चलती का नाम गाडी’ हा अफलातून सिनेमा केला. नंतर ‘व्हिक्टोरिया २०३’मध्ये ते व प्राण यांनी विनोदाची जुगलबंदी पेश केली.
दादामुनींना गाता गळा होताच, शिवाय ते उत्तम चित्रकार व होमिओपॅथीचे तज्ज्ञही होते. १० डिसेंबर २००१ रोजी वयाच्या ९०व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
हिंदी चित्रपटसृष्टीचा खराखुरा ‘दादामुनी’ (थोरला भाऊ) हीच त्यांची खरी ओळख!
- भारतकुमार राऊत